Sunday, October 27, 2019

नर्क चतुर्दशीची ती रम्य पहाट


|| श्री ||
" शुभ दीपावली "
..मोती साबण , नाजनीन अत्तर , राजकोट तेल आणि नवे कपडे
लहानपणीची नर्क चतुर्दशीची पहाट खूप रम्य होती. वर्षभर या दिवसाची वाट बघितलेली असायची . कारण इतक्या पहाटे संपूर्ण वर्षात कधी उठलेलो नसायचो. अगदी अंधार आहे तो पर्यंत घरचे जागं करायचे . रेडिओवर सनईचे सूर वाजत असायचे . वातावरणात सुखद गारवा असायचा . अंगणात आकाश दिव्याचा प्रकाश पसरलेला असायचा . बंबात पाणी तापत असायचं .
दार उघडून बाहेर बघितलं कि गल्लीतल्या घरांवर लावलेले आकाशदिवे प्रकाशमान झालेले असायचे . दारात झकास रांगोळी दिसायची. दूरवर कुठेतरी उडणाऱ्या फटाक्यांचे आवाज कानी यायचे . गल्लीतले माझे मित्र माझ्या आगोदर उठून फटाके उडवत असायचे . मग मी सुध्दा अंगात उत्साह संचारून आवरायला लागायचो. अंगातले कपडे काढून पाटावर बसलं कि अंगाला राजकोट तेल लागायचं. त्याचा तो नाकात बसलेला सुगंध शरीर रोमांचित करायचा . आमच्या घरात असणारं एक जुनं पुराण तांब्याचं घंगाळ समोर मांडलेलं असायचं. त्यातलं गरमागरम, पाणी अंगावर पडायचं. मग मोती साबण खोक्यातून बाहेर यायचा . मोती साबणाचा तो चिरपरिचित सुगंध नाकात शिरायचा . आंघोळ होऊन ओवाळण्याचा कार्यक्रम झाल्यावर अंगात नवे कपडे चढायचे. त्यावर नाझानिनचं अत्तर लावलं जायचं. मनगटावर आणि कानामागेही अत्तर लाऊन मी सज्ज व्हायचो. चहा पोटात ढकलून मी फटाक्यांचे बॉक्स घेऊन बाहेर धाव घ्यायचो.
सावंतांचा दीपक , तांबेलकरांचा आबा माझी वाट पाहत असायचे . त्यांच्याही अंगावर नवीन कपडे असायचे मग सगळे मिळून फटाके उडवायचो. अंधार आहे तो पर्यंत झाड , भुई चक्कर , भूसनळे असले आतीषबाजीचे प्रकार आम्ही उडवायचो. मग लवंगी फटाके, कनकावळे यांचा नंबर लागायचा . पहाटेच्या रम्य वातावरणात आमचा हा आतिश बाजीचा खेळ रंगायचा . उजाडू नये असे वाटत असतानाच फटफटायला लागायचं . फटकेही संपत आलेलेल असायचे . मग फुसक्या फटाकड्या गोळा करून आम्ही त्या उडवत बसायचो. जाळात दारू टाकून पेटवत बसायचो. फटके संपले कि फराळावर तुटून पडायचो. एव्हाना डोळ्यावर पेंग आलेली असायची . मग पुन्हा पांघरुणात शिरायचो . अश्या रीतीने नर्क चतुर्दशीची रम्य पहाट संपायची.
आता मन तसं भाऊन राहिलेलं नसल्यानं नर्क चतुर्दशीच्या पहाटेची पूर्वी प्रमाणे फारशी ओढ वाटत नाही . ते सवंगडी नाहीत , ती निष्पाप मनं नाहीत . मोती साबणाच्या पुडयावरचे मोतीही आता खूप फिक्कट छापलेले आहेत . पूर्वी एक टपोरा मोती खोक्याच्या मध्यभागी असायचा . तो दिसत नाही . मोती साबणाचा सुगंधही आता बदललाय . मी तरी पूर्वीचा कुठं राहिलोय ? ... असो कालाय तस्मै नम: ...
श्याम सावजी ... पंढरपूर

Thursday, October 10, 2019

अजून आठवे ती रात्र पावसाची

|| श्री ||
गेले दोन दिवस पंढरपुरात धुवाधार पाऊस पडतोय . तो ही नेमका रात्री . अगदी वेडया सारखा हा पाऊस काल कोसळत होता. मोठा आवाज करत . त्यात परवा लाईट गेल्या आणि मग आठवल्या लहानपणीच्या आणि तरुणपणीच्या अश्या काही पावसाळी रात्री . त्या आठवणी देतोय ..
-----------------------------------------------------------------------------------
अजून आठवे ती रात्र पावसाची
काल रात्री  पावसाच्या काही जोरदार सरी पंढरपुरात बरसून गेल्या . वीज चमकतच होती आणि गडगडाट करत कोसळली सुद्धा . नेमकी घरातली सरकारी वीज गेली . आम्ही काही मित्र गप्पा मारत बसलो होतो . एक मित्र म्हणाला , " बाहेर असा पावसाचा गोंधळ , विजांचा कडकडाट सुरु असताना घरातली वीज गेली कि रात्र संपता संपत नाही " . मग आमच्या पावसाळी रात्री आलेले अनुभव सांगण्याच्या गप्पा रंगल्या .
अश्या कित्येक भयावह पावसाळी रात्री मी पण अनुभवल्या आहेत . आमचं जुनं घर धाब्याचं होतं , मातीचं माळवद असलेलं . पावसाळ्यापूर्वी माळवदावरचं गवत आम्ही खुरपी घेऊन खुरपायचो . जेणे करून पावसाळ्यात पाणी मुरून घर गळू नये म्हणून . पण तरीही पावसाळ्यात घर गळायचंच . दिवसा काही वाटायचं नाही पण रात्री त्यातल्या त्यात वीज गेल्यावर खूप भेसूर वाटायचं . सवन्यावरचे ( उजेडासाठी माळवदाला असणारा झरोका ) पत्रे जोरात वाजायचे . पत्रे उडून त्यावर ठेवलेले दगड घरात पडतील का काय अशी भीती वाटायची . कंदिलाच्या उजेडात आम्ही बसलेलो असायचो. कडकडणारी वीज आमच्या घरावर कोसळू नये म्हणून माझी आजी अंगणात लोखंडी पहार ठेवायची . लोखंडी पहारेला वीज का म्हणून भिते ? हे कोडं मला तेंव्हा पडायचं.
ढग गडगडतात तो आवाज म्हणजे एक चेटकीण म्हातारी आभाळात जात्यावर पीठ दळत बसलेली असते , तिच्या जात्याचा तो आवाज असतो अश्या कल्पना तेंव्हा डोक्यात आणि मनात घर करून बसलेल्या होत्या . ती म्हातारी त्या भयाण अंधारात डोळ्यासमोर यायची . मग झोपही लागायची नाही . कुठल्याना कुठल्या देवाचा धावा मनातल्या मनात करत मी रात्र लौकर संपू दे अशी विनवणी त्या देवाला करायचो. मधेच कधी तरी डोळा लागायचा आणि सकाळी जाग यायची तेंव्हा प्रसन्न असा तेजस्वी उजेड सगळीकडे पसरलेला असायचा . नव्या घरात राहायला जाई पर्यंत अश्या कित्येक भेसूर पावसाळी रात्री मी अनुभवल्या .
एकदा नौवी दहावीत असताना चित्रपट बघायला गेलो होतो . बाहेर तुफान पाऊस पडत होता . टोकिजच्या बाहेर आलो तर सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं . कसाबसा सरकारी दवाखान्यापर्यंत आलो तर तिथली पुरुषभर उंचीची भदबदी (मोठा नाला ) भरून वाहत होती . माझ्या कंबरे इतके पाणी रस्त्यावर होते . सरकारी लाईट बंद होते . पाण्याला ओढही चांगली होती . झक मारली आणि सिनेमाला आलो असं वाटलं . एक दिशा धरून अंधारात पाण्यातून कसं बसं घर गाठलं.
विट्याला असताना एका नाटकाच्या तालमीसाठी एका खेडेगावकडे मी आणि आमचे दिग्दर्शक तात्या कोळी मिळून निघालो होतो . संध्याकाळी बस मधून उतरून पाऊल वाटेने त्या गावाकडे निघालो आणि पावसाला सुरुवात झाली . ओसाड माळा वर एक झाडा खाली मी आणि तात्या थांबलो . अंधार पडलेला होताच. विजा चमकायला लागल्या . त्यात तात्यांना आठवलं कि वीज नेमकी झाडावरच कोसळते . मग त्या झाडा खालून बाहेर पडून भर पावसात चालत राहिलो आणि गाव गाठलं
जाता जाता :-.. निसर्ग काय आणि माणूस काय .. नियंत्रणात आहेत तोपर्यंत दोघेही सुंदर , जिवलग वाटतात . मात्र एकदा नियंत्रणाबाहेर गेले कि त्यांचं भेसूर रूप जाणवून जातं.......
. श्याम सावजी

Monday, October 7, 2019

दसरा सण मोठा !


|| श्री ||
" दसरा सण मोठा " नावाचा एक धडा आम्हाला प्राथमिक शाळेत असताना होता . दस-या दिवशी मोरूला त्याचे वडील आज दसरा आहे म्हणून लौकर उठवतात आणि मोरू मग दसऱ्याचं महत्व विचारतो . मोरूचे वडील त्याला दस-याचे महत्व सांगतात असा तो धडा होता . खूप छान वाटायचे तो धडा वाचताना . खरं तर आपल्या मातीतले सगळेच सण आनंददायक असताना फक्त दसरा सण मोठा असे का म्हटले आहे ? असा प्रश्न पडायचा तेंव्हा . कदाचित नऊ दिवसांचा उपास संपल्याचा आनंद काही जणांना होत असावा . विनोदाचा भाग सोडला तर लहानपणी दस-याचा आनंद अभूतपूर्व असायचा . शाळेत पाटी पूजन असायचे , हे वेगळे शिवाय संध्याकाळी नवे कपडे घालून डोक्यावरच्या टोपीत घटाचा तुरा खोचून सिमोलंघनाला जायचे असल्याने ती उत्सुकता असायची.परतल्यावर गल्लीतल्या काही घरी मी पाया पडायला जायचो . मग तिथे कडकण्या खायला मिळायच्या .
कडकण्या वरून आठवलं. बाकी कश्यासाठी नवरात्र माझ्या लक्षात राहो न राहो या कडकण्यासाठी नक्कीच लक्षात राहील . कडकण्या हा माझा आवडता खाद्यपदार्थ . दोन तीन कप चहा आणि या भरपूर कडकन्या सकाळी पोटात गेल्या कि दिवस भर जेवण नाही मिळालं तरी चालेल .
पंढरपुरात सिमोलंघनासाठी दक्षिण दिशेला असणाऱ्या रिद्धी सिद्धी गणपतींना जायची प्रथा आहे . संध्याकाळ नंतर आख्ख पंढरपूर या रस्त्याला लोटलेलं असत . काही जणांच्या हातात पेटते पोत , दिवट्या , मशाली तर काही जणांच्या हातात शस्त्रे असतात . दस-याला संध्याकाळी आम्ही सिमोलंघनाला जाताना आधी रस्त्यातच लागणाऱ्या घाडग्यांच्या देवी मंदिरात जायचो . तिथे देवीची गाणी वगैरे व्हायची . कडाडून संबळ वाजायचा . भुते तल्लीन होऊन देवीचे गुणगान करायचे आणि मग त्या सर्वांसह आम्ही पुढे जायचो .
एक सीमोलंघन माझ्या चांगलंच लक्षात आहे . देवळातले कार्यक्रम उरकून आम्ही रिद्धीसिद्धीच्या रस्त्याला लागलो आणि तुफान पाऊस सुरु झाला . भक्तांची त्रेधा तिरपीट उडाली . भूत्यांच्या हातातले पोत आणि भक्तांच्या हातातल्या मशाली विझल्या . आम्हीही एका भिंतीच्या आडोश्याला पावसापासून बचाव करीत उभे राहिलो . आमच्या सोबत देवळातल्या पुजारीण बाई आक्का बाई होत्या त्या म्हणाल्या " आई कोपली " माझ्या बाल मनाला त्यांचं बोलण नीट समजलं नाही पण देवी खरंच कोपली असेल का असा प्रश्न मला त्या वेळी पडला होता . असो .
" दसरा उजाडला " नावाचं एक ग्रामीण नाटक पूर्वी खूप गाजलं होत . या नाटकाचे पंढरपुरातही प्रयोग झाल्याचं मी ऐकलं होत. पंढरपूरच्या कलाकारांबरोबरच सुर्यकांत , चंद्रकांत , आणि गुलाब मोकाशी असे नामांकित अभिनेते नट त्यात काम करायचे असं मी ऐकलं होत . मराठी चित्रपट सृष्टीतले नामांकित लेखक , दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी हे नाटक लिहिलेलं होत .
दस-याच्या तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा ! पुढच्या दस-या पर्यंत तुमचा आनंद द्विगुणित होत जावो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !
जगदंब !
-
श्याम सावजी ................पंढरपूर

पंढरपूरच्या देवी .. ७




|| श्री ||
लखूबाई अर्थात दिंडीर वनातील रुक्मिणी आई 
पंढरपूरच्या पूर्वेला चंद्रभागेच्या काठावरच एका उंच चौथ-यावर हे लखुबाईचं मंदिर आहे . या भागाला पुराण काळात दिंडीर वन म्हणत होते असे सांगतात . लखुबाई हे माता रुक्मिणीचं लोक नाव . रुक्मिणी दिंडीर वनात कशी आली याची एक आख्यायिका येथे सांगितली जाते . माता रुक्मिणी आणि भगवान श्री कृष्ण एकांतात गप्पा मारत असताना राधेची हाक भगवंतांच्या कानावर आली . राधेच्या हाकेने भगवंत सैरभैर झाले . त्यांचं मन राधेकडे ओढ घेऊ लागलं. हे बघून रुक्मिणी मातेचा पारा चढला आणि ती रागारागाने तिथून निघाली . रुसलेली रुक्मिणी तडक दिंडीर वनात आली आणि तिथे लपून बसली . पाठोपाठ भगवान रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी दिंडीर वनात आले . येताना वाटेत त्यांची पुंडलीकाशी भेट झाली आणि पुंडलीकाने फेकलेल्या विटेवर भगवान उभे राहिले ते श्री विठ्ठल म्हणून लोकमान्य झाले .
एका उंच दगडी चौथर्यावर हे लखू बाईचं मंदिर आहे . चंद्रभागा नदी काठावरची जवळपास सगळीच मंदिरं अशी उंच चौथर्यावर आहेत . पुराच्या दृष्टीने हि खबरदारी असावी . वन म्हणावं असं आता या भागात काही नाही . ना झाडी ना झुडूप . मंदिराच्या आसपास एक दोन झाडे शिल्लक आहेत हीच काय ती वनाची खुण . लखूबाईची मूर्ती पूर्वाभिमुख आहे . लखूबाई च्या दर्शनाला महिलांची खूप गर्दी असते .
लखुबाइच्या पूजेने पतीचे आयुष्य वाढते आणि घरात सुख शांती राहते असे बोलले जाते . देवी मंदिराच्या कडेने प्रदक्षिणेसाठी असणारा मार्ग हा अगदीच चिंचोळा असल्याने आणि चौथरा उंच असल्याने प्रदक्षिणा मारताना मी लहानपणी खूप घाबरायचो . कित्येकदा मी प्रदक्षिणा अर्ध्यातून सोडून दिली . आता ग्रीलचे कठडे बसवल्याने प्रदक्षिणा मारणं सुखकर झालं आहे ........ श्याम सावजी .......पंढरपूर —

Sunday, October 6, 2019

पंढरपूरच्या देवी - ६





|| श्री ||
जुन्या अकलूज रोडची दुर्गा देवी
पद्मावती प्रमाणेच हि देवी सुद्धा टेकडीवर आहे . रानावनात , हिरव्यागार शेतीत हि टेकडी आहे . पंढरपूर सोडून दुसऱ्याचं कुठल्यातरी भागात आल्यासारखं या ठिकाणी आल्यावर वाटतं. अर्थात पंढरपूरपासून बरीच लांब जुन्या अकलूज रस्त्याला हे देवीचे मंदिर आहे.
या देवी बद्दल मला काही माहिती न्हवती . एकदा माझ्या काही विद्यार्थ्यांनी मला या देवी बद्दल माहिती दिली आणि चला जायचं का ? असं विचारलं . नेमके ते नवरात्रीचे दिवस होते . मग त्यांच्या बरोबर पहिल्यांदा या देवीला आलो. पंढरपुरच्या वायव्य दिशेला हि देवी आहे . जुन्या अकलूज रोडला हे मंदिर लागतं . पंढरपूर पासून सुमारे ५ ते ६ किलोमीटर अंतर असल्याने नेहमी या देवीला जाणाऱ्या भक्तांची संख्या कमीच असेल पण नवरात्रीत हि टेकडी माणसांनी फुलून येते . आजूबाजूला हिरवीगार शेतं आणि गावापासून दूर असल्याने आपण एखाद्या पर्यटन स्थळी आल्याचा भास होतो . या टेकडीच्या पायथ्याला एक ओढा आहे . इतर वेळी हा कोरडा असतो पण पावसाळ्यात याला पाणी येतं आणि मग हा परिसर खूप रमणीय दिसतो . इथं येणारे शाळा , महाविद्यालयाचे विद्यार्थी सहलीला आल्याप्रमाणे बरोबर खाद्य पदार्थ वगैरे घेऊन येतात व या टेकडीवर त्यांचा आस्वाद घेतात .
एका जाणकार व्यक्तीने अपत्यप्राप्तीसाठी आम्हा उभयतांना ११ रविवारी
राहू काळात दुर्गा देवीच्या दर्शनाला जाण्यास संगीतलं होतं. मला हि देवी आठवली .त्यानुसार आम्ही दर रविवारी राहू काळात या दुर्गा देवीच्या दर्शनाला जायचो . रविवारचा राहू काळ साडे चार ते सहा या वेळेत येतो . या काळात या मंदिरात देवीसमोर आम्ही दिवा लावायचो आणि अपत्यप्राप्तीची प्रार्थना करायचो. ११ रविवार झाल्यानंतर आम्ही या देवीला चांदीचा पाळणा अर्पण केला . आज दोन गोड मुलं आमच्या घरात रांगत आहेत. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. असो.
मावळतीला जाणारा सुर्य आणि त्याचे पसरलेले लालसर पिवळे ऊन यामुळे हि टेकडी आणि हा परिसर संध्याकाळच्या वेळी खूपच देखणा दिसतो . टेकडी आणि आजूबाजूची शेते या पिवळसर उन्हात न्हाऊन निघतात आणि निसर्गाची जादू आपल्या मनावर मोहिनी घालते .
" संधीकाली या अश्या धुंदल्या दिशा दिशा " अशी मनाची अवस्था होते . ...............
.श्याम सावजी ..........पंढरपूर

पंढरपूरच्या देवी - ५

|| श्री ||
कासेगाव शिवेवरची भुवनेश्वरी देवी
पंढरपूरच्या दक्षिणेला यमाई तुकाई मंदिराच्या थोडे पुढे गेल्या नंतर मुख्य रस्ता सोडून आणखी एक कच्चा रस्ता कासेगावकडे जातो . या रस्त्याला बरोब्बर कासेगाव शिवेवर भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे. येथून पुढे कासेगाव हद्द सुरु होते . पंढरपूरच्या रक्षणार्थ हि देवी पंढरपूर शिवेवर उभी असल्याचं सांगितलं जातं. यादेवीबद्धल फारशी माहिती किंवा दंत कथा मिळू शकली नाही मात्र हि देवी पंढरपूरकर आणि कासेगावकर या दोन्ही मंडळींमध्ये लोकप्रिय आहे. अगदी मोकळ्या माळावर असल्याप्रमाणे हे देवीचे मंदिर आहे. अगदी तुरळक घरे आजूबाजूला उभी आहेत. मंदिरात देवीच्या मुर्तीसामोराची दगडी चौकट काहीशी लहान असल्याने मूर्तीचे थोडे दुरूनच दर्शन होते.
भुवनेश्वरीचे दर्शन करून भाविक पुढे कासेगावच्या देवीच्या दर्शनाला जातात. येथेच देवी मंदिरा समोर शिवेवरच्या मारुतीचे मोठे मंदिर आहे ...
जगदंब....... ...................श्याम सावजी.. पंढरपूर

पंढरपुरातील देवी .. ४

|| श्री ||
 टेकडीवरची आई . पद्मावती माई 
पंढरपूरच्या नैरुत्त्य दिशेला छोट्याश्या डोंगरासारखी वाटणारी हि टेकडी होती . बाहेरून दगड मातीचा ढीग दिसत असला तरी आतल्या बाजूने विस्तीर्ण भव्य असे एखाद्या स्टेडीयम सारखे पाय-या पाय-या चे दगडी बांधकाम दिसायचे .याला पद्मावतीचे तळे असेही म्हणतात . यात आता पाणी नाही आजही हे विस्तृत भव्य चौरस बांधकाम तसेच आहे . आत नगरपालिकेने सुंदर बाग बनवली आहे मात्र बाहेरील बाजूने बनवलेल्या शॉपिंग सेंटर मुळे टेकडी मात्र नष्ट झाली . आमच्या भागात डोंगर वगैरे प्रकार कधी बघायला मिळत नसल्याने हि टेकडी हाच आमच्यासाठी मोठ्ठा डोंगर होता . डोंगरावर जायची लहर आली कि या टेकडीवर जायचे . या टेकडीच्या आतील बाजूस पद्मावती देवीचे मंदिर होते . म्हणजे अजूनही आहे . या चौरसाकार तळ्याच्या मध्यभागी पद्मावती देवीचे हे मंदिर आहे . या मंदिरा पर्यंत जाण्यासाठी लहानसा दगडी पूल आहे . मंदिरात पद्मावती देवीचा तांदळा आहे .
माझी आदर्श प्राथमिक शाळा ही या पद्मावतीच्या टेकडी पासून हाकेच्या अंतरावर . त्यामुळे कधी या दिशेने शाळेत आलो किंवा घरी निघालो कि ही टेकडी दिसायची . शाळेच्या वयात मला डोंगर म्हणतात तो हाच असे वाटायचे . नंतरच्या आयुष्यात बरेच उंच डोंगर चढून गेलो पण पद्मावतीच्या या टेकडीचे थ्रिल काही औरच होते .
एकदा पहिली दुसरीत असताना शाळेत मी काही तरी खोडी केली आणि बाईंनी मला न्यायला आलेल्या माझ्या आज्जीला ते सांगितले . आज्जीचा पारा चढला " चल तुला त्या डोंगरावर सोडते " असे म्हणत तिने मला ओढत त्या टेकडीवर आणले . त्या वेळी माझ्या दृष्टीने आतली तळ्याची खोली खूपच होती त्यामुळे मी घाबरून गेलो त्यात पुन्हा या डोंगरावर देवी राहते असे मी ऐकले होते . आता देवी म्हणजे वाघ आलाच . ही आज्जी बया आपल्याला या डोंगरावर सोडून गेली आणि वाघोबा आले तर काय ? आणि नेमकी देवी त्याच्या वर नसली तर त्याला कोण कंट्रोल करणार ? या कल्पनेने मला घाम फुटला .मी आज्जीच्या पायावर लोळन घेत "पुन्हा असे करणार नाही . शाळेत नीट वागेन " अशी गयावया केली पण आज्जी ऐकेना . " तुला इथेच सोडून जाणार " म्हणाली . संध्याकाळची वेळ असल्याने अंधार पडत चाललेला होता .माझ्या नशिबाने नेमकी तळ्याच्या मैदानात काही तरुण मुले वौलीबॉल खेळत होती .त्यातला एक तरुण धावत आला आणि त्याने माझ्या आज्जीची समजूत घातली . देवीसमोर अंगात आलेल्या स्त्रीला आजूबाजूचे सगळे "शांत व्हा आई " अशी विनवणी करतात आणि मग ती स्त्री शांत होते तसा प्रकार झाला आणि आज्जी शांत झाली .
तो तरुण नंतर बरेचदा रस्त्यात भेटला कि ती आठवण करून द्यायचा आणि विचारायचा " आता नाही ना खोड्या करत शाळेत ? " .
पद्मावतीच्या त्या भागातून जाताना मला ही आठवण कधी आली की मी स्वतःशीच हसतो आणि मी एकटाच का हसतोय ? म्हणून लोक माझ्याकडे बघून हसतात . हसो बिचारे .... .....
.जगदंब !.........श्याम सावजी .........पंढरपूर

Saturday, October 5, 2019

पंढरपुरातील देवी दर्शन - ३


यमाई तुकाई
(
ये माई तू का आली ?)
पंढरपूरच्या दक्षिणेला सांगोला रोडला यमाई तुकाईचे मंदिर आहे . उत्तरेकडे तोंड करून असलेल्या या साध्या सुध्या मंदिरात दोन तांदळे आहेत . यांना यमाई आणि तुकाई असे म्हणतात . पंढरपुरातील हे महत्वाचं आणि प्रसिद्ध देवी मंदिर आहे . नवरात्रीत तर या मंदिरात गर्दी असतेच पण मंगळवार , शुक्रवार या देवीच्या दर्शनाला येणाऱ्यांची संख्याही कमी नाही. पूर्वी गावापासून काहीसे बाहेर आणि लांब ओसाड माळावर असे हे मंदिर असल्याने या देवीच्या दर्शनाला येताना भाविक पूर्वी हमखास टांग्याचा वापर करत. काही श्रद्धाळू भाविक तेंव्हाही चालत येत आणि आजही येतात. आता पंढरपूर या मंदिराच्याही पुढे पसरले आहे. इथून जवळच जिल्हा न्यायालयाची इमारत झाल्याने मोठ्या प्रमाणावर माणसांची वर्दळ असते.
या देवीची अख्याइका पुढील प्रमाणे सांगतात .
रावणाने सीतेचं अपहरण केल्यानंतर राम आणि लक्ष्मण या भागातून सीतेचा शोध घेत जात होते . राम खुपच शोकमग्न अवस्थेत होते . हे पार्वती मातेनं बघितलं आणि भगवान शंकरांना विचारलं , " रामाचा हा शोक खरा आहे का ? रामाला शांत कोण करणार ? " भगवान शंकर म्हणाले , " रामाला शांत करणं मला जमणार नाही . तू प्रयत्न करून बघ . " श्री रामाची परीक्षा घेण्याच्या हेतूनं पार्वती मातेनं सीतेचं रूप धारण केले आणि त्या श्री रामा समोर आल्या . मात्र श्री रामांनी सीता रूपातल्या पार्वती मातेला ओळखलं आणि तिला प्रश्न केला , " ये माई तू का आली ? " रामाने आपल्याला ओळखल्याचे बघताच पार्वती माता अदृश्य झाल्या त्या याचं ठिकाणी .
हे दोन तांदळे म्हणजे पार्वती माता आणि त्यांचे सीता रूप आहेत आणि ये माई .. तू का आली ? चा अपभ्रंश झाला यमाई तुकाई ... येथून जवळच पद्मावतीचे तळे आहे . यमाई तुकाईला आल्या नंतर भाविक येथून जवळच असणाऱ्या भूवनेश्वरीच्या दर्शनाला जातात तर काही जण आणखी पुढे जात कासेगावाच्या प्रसिद्ध देवीचेही दर्शन घेतात . भुवनेश्वरी देवी कासेगाव शिवेवर आहे . ..... श्याम सावजी ..... पंढरपूर

पंढरपुरातील देवी दर्शन - २

|| श्री ||
मंगळवेढा रोडची घाडग्यांची देवी
पंढरपूरच्या अग्नेय दिशेला चंद्रभागेच्या काठावर हे मंदिर आहे यमाई तुकाई सोडली तर पंढरपुरच्या इतर चारही मुख्य देवी आग्नेय ,नैरुत्य ,वायव्य आणि ईशान्य या दिशांना आहेत . ( या पंढरपूरच्या सीमा रक्षक या उद्देशाने स्थापन केल्या गेल्या असाव्यात का ?) मंगळवेढ्याला जाणाऱ्या रोडवर एक लहानशी किल्ल्या सारखी किंवा गढी सारखी पडकी वास्तू आहे त्यात हे देवीचे मंदिर आहे . घाडगे नावाच्या सरदाराची हि गढी असल्याचं मी लहानपणी ऐकलं होतं . त्यामुळे आम्ही या देवीला घाडग्यांची देवी असं म्हणायचो . मला लहानपणी किल्ल्यात आल्याचं समाधान इथं आल्यावर व्हायचं .आत भरमसाठ वाढलेली झाडी आजही आहे . या देवीच्या मंदिराकडे तसं दुर्लक्षच झालं होतं तेंव्हा . पूर्वी एका लहानश्या पत्र्याच्या खोलीत देवीची मूर्ती होती. आता मोठं बांधकाम सुरु आहे . या नवरात्रात हे बांधकाम जवळ जवळ पूर्णत्वास आलेलं दिसलं .
अंबाबाई पटांगणातील देवीच्या माझ्या तितक्याश्या आठवणी नाहीत कारण तेंव्हा मी पाळण्यात होतो मात्र या देवीच्या बाबतीत माझ्या आठवणी ताज्या आहेत .
देवीच्या खोली बाहेर मोठ्ठा ओटा होता त्यावर मंदिराच्या पुजारीणबाई त्यांना आक्का बाई म्हणायचे त्या बसलेल्या असायच्या. वयस्कर होत्या आणि एकदम कडक . मंदिरातली शिस्त कोणी मोडली कि त्या रागवायच्या . याचा फटका मला पण बसला होता . त्यामुळे त्यांना मी खूप घाबरायचो . त्यांच्या कडेने आराधी , गोंधळी आणि भक्त महिलांचा गराडा असायचा . टांग्यातून पूजेचे साहित्य घेऊन आम्ही मंदिरात जायचो . माझ्या घरचे आक्का बाईशी गप्पा मारण्यात किंवा पूजेत गर्क झाल्यावर मी समोरच्या मैदानात खेळायला पळायचो . देवीच्या मूर्तीच्या समोर काही लहान लहान मंदिरे म्हणजे देवळ्या आहेत त्यात मरिआइ वगैरेंचे तांदळे आहेत . एक माकडाची मूर्ती आहे . या मूर्तीची कथा मी नंतर सांगेन . एक विटा आणि चुन्याची बनवलेली फारशी उंच नसलेली दीपमाळ आहे . ही दीपमाळ आणि ती छोटी छोटी मंदिरे एका रेषेत असल्याने मला ते सगळे रेल्वे गाडी प्रमाणे वाटायचे . ती दीपमाळ म्हणजे रेल्वेचे धुरांडे आणि मागची ओळीत असणारी देवळे म्हणजे तिचे डबे . दीपमाळ आणि इतर देवळे यांच्या मध्ये मोकळी जागा होती त्यात बसून मी ती र्रेल्वे चालवल्याचा अभिनय करायचो . हा... हा... हा... जणू काही ते देवीचे मंदिरच मी ओढून नेत होतो . या दीपमाळे जवळ एक छोटंसं चाफ्याचं झाड होतं . अगदी लहान उंचीचे पण बळकट . त्याच्यावर चढून त्याच्या फांद्या वरून उड्या मारायचाही उद्योग मी येथे आल्यावर करायचो ... लहानपणी या देवी बद्दल ब-याचश्या आख्यायिका ऐकायला मिळाल्या होत्या . त्यातील एका आख्यायिकेनुसार या गढी जवळच्या शेतात नांगरट करताना हि देवीची मूर्ती सापडली . दुसऱ्या आख्यायिकेनुसार घाडगे सरदारांना तुळजापूरला जायला वयोमानाने जमेना याची त्यांना खंत वाटू लागली . तेंव्हा एकदा स्वप्नात येउन देवीने आपण त्यांच्या गढीतील विहिरीत असल्याचे सांगितले . सकाळी सरदार घाडगे यांनी शोध घेतला असता विहिरीच्या एका कोनाड्यात त्यांना हि मूर्ती सापडली .. तीच हि आजची देवीची मुर्ती . सरदारांनी गढीतच तिचं छोटसं मंदिर बांधलं आणि तिथेच ते देवीची पूजा ,अर्चा ,सेवा करू लागले .आजही ती विहीर आणि त्या विहिरीतली मूर्ती सापडलेली देवळी तशीच आहे .
लहानपणी विहिरींची भीती वाटत असल्याने मी मंदिरा मागे असणाऱ्या या विहिरीकडे जात नसे . गढीचे भग्न अवशेष घाडगे सरदारांच्या वैभवाची साक्ष आजही देतात . गढीचे काही बुरुज आणि तट अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत . मुख्य दरवाजा भव्य आणि देखणा आहे . त्या जुन्या काळाची आठवण करून देत दिमाखाने उभा आहे . गढीच्या परिसरात भूतेश्वर महादेवाचे मंदिर आहे . त्याच्या समोर राम मंदिर आहे . ही गढी आणि गढीचा परिसर हा माझ्या साठी आनंदाचे ठिकाण आहे . या मंदिराच्या परिसरात बसून मावळतीला जाणारा सुर्य बघणे हा माझा आवडता छंद .. जगदंब ! ...............................श्याम सावजी ..पंढरपूर

Friday, October 4, 2019

पंढरपूरातील देवी दर्शन. . 1

|| श्री ||
पंढरपूरातील देवी दर्शन. . 1
अंबाबाई पटांगणातली देवी
पंढरपूरच्या ईशान्येला चंद्रभागेच्या काठावर हे देवीचे मंदिर आहे. मोठ्या विस्तीर्ण वृक्षांनी हे मंदिर वेढलेले आहे. मंदिरासमोरच्या एका वृक्षाच्या ढोलीत एक माणूस सहज बसू शकेल इतकी मोठी ढोली या वृक्षाला आहे या वरून या वृक्षाची जाडी आणि जुनेपण लक्षात यावे. मंदिर साधे सुबक आहे. मंदिरात देवीची सुबक मूर्ती आहे . तुळजापुरच्या देवीचीच हि प्रतिकृती असल्याचे म्हटले जाते . निसर्ग रम्य वातावरणात असलेल्या या मंदिरात पंढरपूरकर मोठ्या प्रमाणावर मंगळवार आणि शुक्रवारी गर्दी करतात . नवरात्रीत तर या मंदिराबाहेरील रांग संपता संपत नाही .पंढरपुरातील हे मुख्य देवी मंदिर आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही . पूर्वी या मंदिराच्या कडेने असणाऱ्या मैदानाला आंबाबाईचे पटांगण म्हटले जायचे . या मैदानात क्रिकेटचे सामने नेहमीच भरायचे .
...आम्ही जुन्या पेठेत राहायला आल्यावर त्यावेळी आमची परिस्थिती तशी वाईट होती . माझ्या घरच्यांनी या देवीच्या दर्शनाला जायला सुरुवात केली . योगायोगाने आमची परिस्थिती सुधारली . चांगले दिवस आले . समृद्धी आली . स्वतःचे घर खरेदी केले . या देवीवरची आमच्या घरच्यांची श्रद्धा वाढली .आणि मग हे देवीचे देऊळ नवरात्रीत रंगवण्याचा खर्च आमच्या घरच्यांनी देण्यास सुरुवात केली . देवळाच्या भिंतींवर पौराणिक प्रसंग वनारे पेंटर खूपच सुंदर पद्धतीने काढायचे . काही वर्षे ह्या उपक्रमात सातत्य राहिले मात्र काही कारणा वरून मंदिराच्या पुजाऱ्याशी तात्विक मतभेद झाल्याने आमच्या घरच्यांनी हा उपक्रम बंद केला आणि मग मंगळवेढा रोडला असणाऱ्या घाडग्यांच्या देवीला जायला आमच्या घरच्यांनी सुरुवात केली .. या घाडग्यांच्या देवी बद्दल मी सांगणार आहेच पण तो पर्यंत जगदंब .
सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा ! .... श्याम सावजी ..पंढरपूर